लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून, कमाल तापमान ३४ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने पारा ४५ अंशाच्या घरात राहणार आहे. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच तेथे पुरेसा औषधसाठाही ठेवण्यात येत आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. तसेच त्यामुळे मृत्यू होणेही संभव असते. त्यातच आतापासूनच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढत चालले आहे. शहराचा पारा ३४ अंशावर जात आहे. जिल्हा उन्हात खूप तापतो. या पार्श्वभूमीवर उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे.
उपचार काय ?
- रुग्णास वातानुकूलित किंवा मोकळ्या हवेशीर खोलीत ठेवणे. खोलीत पंखे, कुलर असावेत.
- रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न
- रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, आइस पॅक लावणे
- आवश्यकतेनुसार सलाइन देणे
उष्माघाताची कारणे
- उन्हाळ्यात शेतात किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे.
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये तसेच काच कारखान्यात काम.
- अधिक तापमानाच्या खोलीत काम.
- घट्ट कपड्याचा वापर.
उष्माघाताची लक्षणेथकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे.भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना किंवा पेटके येणेरक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था.
प्रतिबंधात्मक उपाय
- वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे टाळणे.
- कष्टाची कामे सकाळी किंवा सायंकाळी कमी तापमानात करणे
- उष्णता शोषून घेणारे कपडे (काळी 3 किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत.
- सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत.
- जलसंजीवनीचा वापर, भरपूर पाणी प्यावे.
- सरबत प्यावे, उन्हामधील काम अधूनमधून थांबवावे. सावलीत विश्रांती घ्यावी.
- उन्हात बाहेर जाताना चष्मा, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा.