देवरी : शहरात विविध प्रकारच्या समस्या असून त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. वारंवार सूचना देवून सुद्धा प्रशासनीक अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. शहरातील ज्वलंत समस्या सोडविण्या संबंधी पाच महिन्यापुर्वी भाजयुमो जिल्हाउपाध्यक्ष इंदरजितसिंग भाटिया यांनी उपविभागीय अधिकारी देवरी यांना निवेदन दिले होते. परंतु अजुनपर्यंत त्या समस्या प्रशासनाद्वारे सोडविण्यात आल्या नाही. भाटिया यांनी सांगितले की, पाच महिन्यापुर्वी दिलेल्या निवेदनात नॅशनल हायवे ते दुर्गा चौक, पंचशील चौक रस्त्याची निर्मिती, ब्लॉसम पब्लिक स्कूल, बचपन स्कूल, मनोहरभाई पटेल या मुख्य रस्त्यावर असलेल्या शाळांसमोर गतीरोधकाची निर्मिती करणे शहरातील जिर्ण झालेल्या रस्त्यांचे नवीनीकरण करणे, त्याचप्रमाणे देवरी ग्रामीण रुग्णालयाचे छत पुर्णत: जिर्ण झाले असून केव्हाही रुग्णांच्या अंगावर पडू शकते, भिंतीना शेवाळ लागले असून पडण्याच्या स्थितीत असलेल्या भिंतींना दुरुस्त करणे, उन्हाळ्यात रुग्णालयाला पाणी व कुलरची व्यवस्था करणे, तसेच ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, ग्रामीण रुग्णालयाचे दोन्ही मार्ग मोकळे करुन संकेत फलक लावावे, जेणेकरुन जखमी अवस्थेतील रुग्णांना रुग्णालय शोधायला अडचण भासणार नाही. जेणेकरुन तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा तसेच चालायला चांगले रस्ते मिळणार. या ज्वलंत समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्याची मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष भाटीया यांनी प्रशासनीक अधिकाऱ्यांकडे केली असून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. याकडे मात्र अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने भाजयुमो आंदोलन करणार असा इशारा भाटीया यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: June 19, 2015 1:25 AM