सौंदड : दरवर्षी प्रमाणे चालू हंगामातही महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनद्वारे सहकारी धान गिरणी, सहकारी खरेदी विक्री संस्था व ईतर संस्थाद्वारे शासनाच्या आधारभूत किंमती नुसार रबी हंगामाची धान खरेदी करणे सुरु आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रांवर गर्दी वाढली असून ३० जून पर्यंत धानाचा काटा (खरेदी) करणे शक्य नसल्याने धान खरेदीची किंमत वाढविण्याची मागणी येथील सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष रमेश चुऱ्हे यांनी केली आहे. खुल्या बाजारात धानाचे दर फारच कमी असल्याने तसेच शासनाने प्रति क्विंटल २५० रु. प्रोत्साहन राशी देण्याचे घोषीत केल्यामुळे शेतकरी उत्पादीत धान व्यापाऱ्याकडे न नेता सरळ मोठ्या प्रमाणात सहकारी धान खरेदी केंद्रावर नेत आहे. त्यामुळे धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परंतू पाहिजे त्या प्रमाणात बारदाना व गोदाम उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हाभर खरेदी मंदगतीने सुरु आहे.शासनाने आधारभूत केंद्रावर धान खरेदीची मुदत ३० जून पर्यंत दिली आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांचे धान दिलेल्या मुदतीत काटा करणे शक्य नाही. सौंदड केंद्रांतर्गत राका, पळसगाव, पिपरी, भदूटोला, फुटाळा, सावंगी, बोपाबोडी, घाटबोरी, खोडशिवनी, सिंदीपार, बिर्री, गिरोला, हेटी आदी गावातील धान खरेदी केंद्रावर येत आहे. तसेच या केंद्रांशी संलग्न ईतर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहिरी व बोअरवेल्स द्वारे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था केल्यामुळे तसेच सिंचन व्यवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे सौंदड केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी केंद्रावरील गर्दी बघता व पावसाच्या भितीने स्वत:चे घरीच धान साठवून ठेवले आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत सौंदड केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचे धान मोजमाप करणे शक्य नाही. करीता धान खरेदीची मुदत २० जुलै पर्यंत वाढविण्याची मागणी चुन्हे यांनी केली. (वार्ताहर)
उन्हाळी धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी
By admin | Published: June 19, 2015 1:25 AM