गोंदिया : भंडारा अर्बन बँकेच्या येथील शाखा कार्यालयात विजेची सोय असताना विद्यमान संचालक गोपीचंद थावानी यांनी जनरेटरमध्ये डिझेल लागल्याचे भासवून लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. कार्यालयात महिनाभर वीज नसली तरीही १२ हजार रूपयांपेक्षा जास्तीचे डिझेल लागणार नाही. मात्र थावानी यांनी यांनी १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ या काळात २ लाख ९५ हजार १३८ रुपयांचे डिझेल घेतल्याचे लेजर मध्ये नोंदविले असून त्यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आनंद कृपाण यांनी केला आहे. दि भंडारा अर्बन को आॅप. बँकेचे येथील शाखा कार्यालय भाड्याच्या इमारतीत असून तेथे विजेची सोय आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास बँकेचे काम सुरळीत चालावे यासाठी बँकेने स्वत:चे जनरेटर विकत घेतले आहे. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ व त्यानंतर सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी डिझेल विकत घेतल्याचे बिल जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी तीन-तीन वेळा डिझेल घेतल्याचे लेझर बुकवर नोंद आहे. वीज पुरवठा सुरळीत असताना एकाच दिवशी १२०० ते १३०० रुपयाचे बिल कसे जोडण्यात आले आहे. यावरून महिन्याकाठी ३० हजार रुपयांचे डिझेल खरेदी केल्याचे दाखवून खोटी बिले सादर करण्यात आली. यात लाखो रूपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचे कृपाण म्हणाले. यासाठी १५ वर्षापासून बँकेचे संचालक म्हणून काम करणारे थावानी यांनी जनतेचे पैसे घोटाळा करुन स्वत:च्या खिशात टाकले आहे. डिझेलवर एवढा खर्च झाला तर वीज बिल आलेच नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी त्यांनी केली. मानेवाडा (नागपूर), धरमपेठ, वडसा व ब्रह्मपुरी येथे बँके च्या नवीन शाखा निर्माण करून अर्बन बँकेला ९१.१३ लाखांचा तोटा बसविला आहे. यातही सत्तारुढ संचालकांनी स्वार्थापोटी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखांसाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी केले आहे. तसेच सन २००९ मध्ये बँकेच्या ठेवी २९८.०३ कोटी होत्या. त्यात आता बँकेच्या चार शाखांची वाढ झाली असून सुद्धा ठेवीत मात्र घट झालेली असल्याचेही कृपाण यांनी सांगीतले. यावरून संचालकांवर ग्राहक ठेवीदाराचा किती विश्वास आहे, हे दिसून येत असल्याचेही कृपाण यावेळी म्हणाले. तर सन २०१५ मध्ये विकासनाम्यात दाखविण्यात आलेला ३.४३ कोटींचा नफा चुकीचा आहे. हा नफा वैधानिक तरतुद न करता दाखविण्यात आला आहे. सन २००९ मध्ये सर्व वैधानिक तरतुदी केल्यानंतरचा निव्वळ नफा १.९३ कोटी इतका होता. मात्र विकासनाम्यात विद्यमान संचालकांनी दाखविलेला नफा वैधानिक तरतुदी न करता दाखविला होता. सन २०१४-१५ मध्ये बँकेला १.८५ कोटींचा शुध्द तोटा झाला असून याला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार आहे. विशेष म्हणजे नोकर भरतीत भंडारा व गोंदिया येथील लोकांची निवड यवतमाळ येथील लोकांना भरण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उम्मेदवारांवर संचालकांनी अन्याय केला असल्याचा आरोपही कृपाण यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)
डिझेलच्या नावावर लाखो रुपये गडप केले
By admin | Published: July 04, 2015 2:15 AM