गोंदिया : सध्या खरिपाचे पीक निघायचे आहे. हलक्या धानाची कापणी सुरू झाली असून भारी धान कापणीला तयार होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. मात्र १ नोव्हेंबरपासून रबी हंगामासाठी तयारी सुरू होणार असल्यामुळे कृषी विभागाने तसे नियोजन केले आहे. यावर्षी रबीच्या पिकांसाठी एकूण ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.सद्यस्थितीत खरीप हंगामाच्या हलक्या धान पिकांची कापणी केवळ १० टक्केच झाली आहे. ही धान कापणी पूर्ण होताच भारी धान पिकांची कापणी सुरू होणार आहे. या धानाच्या मळणीनंतर लगेच रबी हंगामाच्या कामात जिल्ह्यातील शेतकरी गुंतणार आहेत. १ नोव्हेंबरपासून लाखोळी व जवस या रबी हंगामाच्या पिकांची लागवड सुरू होणार आहे. तर गहू व हरभरा पिकाला पाण्याची गरज असल्यामुळे त्यांची लागवड १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकरी रबी पिकांसाठी शेतीच्या कामात गुंतणार आहे.रबी हंगामासाठी गव्हू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन हजार ९२० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र तीन हजार हेक्टर एवढे आहे. तर हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र चार हजार ०९० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र नऊ हजार हेक्टर आहे. कडधान्यापैकी लाखोळी, वाल, वाटाणा इत्यादीचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ८०० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. जवस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ हजार ६३० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १० हजार हेक्टर आहे. तर भाजीपाला पिकाचे प्रस्तावित क्षेत्र दोन हजार ५०० हेक्टर आहे. तसेच उन्हाळी धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ७६० हेक्टर असून प्रस्तावित क्षेत्र १२ हजार हेक्टर आहे.यावर्षी वेळेवर पावसाने साथ न दिल्यामुळे खरिपात शेतकऱ्यांनी ठरविल्याप्रमाणे लाभ होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नजर आता रबीच्या हंगामावर लागून आहे. (प्रतिनिधी)
रबीचे प्रस्तावित क्षेत्र ५१.५० हजार हेक्टर
By admin | Published: October 24, 2015 1:48 AM