शनिवारपासून संततधार : शेतीच्या कामांना आला वेग गोंदिया : मागील आठ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे. त्यात शनिवारपासून (दि.२०) संततधार बरसत असलेल्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. संततधार पावसामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत. रविवारी (दि.२१) सकाळपर्यंत आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात अतिवृष्टीची माहिती आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ३५३२.२ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मृगाची सुरूवात कोरडी झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पाऊस दडी मारणार या भितीने शेतकऱ्यांच्या माथ्यावर चिंतेचे सावट दिसून येत होते. यामुळेच शेतीची कामे बंद पडली होती. मात्र मागील रविवारपासून (दि.१४) पाऊस जिल्ह्यात तळ ठोकून बसला आहे. दिवसभर उघाड राहिल्यानंतर दररोज सायंकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने सर्वच सुखावले आहे. पावसाचे हे सुखावह आगमन होत असल्याने शेतकऱ्यांनी कंबर कसून शेतीच्या कामांत हात घातला आहे. मात्र शनिवारच्या (दि.२०) दुपारपासून संततधार पावसाने हजेरी लावली असून अवघ्या जिल्ह्याला झोडपून काढले आहे. प्राप्त माहितीनुसार, १ ते २१ जून पर्यंत जिल्ह्यात ३५३२.२ मीमी. पाऊस पडला आहे. त्याची सरासरी १७ मीमी. आहे. विशेष म्हणजे आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात सर्वाधिक ७६.८ मीमी. एवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या संततधार पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला असतानाच मात्र सर्वसामान्यांची कामे अडकल्याचेही दिसून आले. पावसामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता व नागरिकांना घराबाहेर पडणे कठिण झाले. शहरातील झोपडी मोहल्यात तर मोठ्याप्रमाणात पाणी शिरल्याचेही दिसून आले. (शहर प्रतिनिधी)प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील चार प्रमुख प्रकल्पांत पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, इटियाडोह प्रकल्पात ९०.४ दलघमी म्हणजेच ८.३० टक्के जलसाठा, सिरपूर प्रकल्पात २१.२२ दलघमी म्हणजेच ६.२० टक्के जलसाठा, पूजारीटोला प्रकल्पात ६.५२ दलघमी व कालीसराड प्रकल्पात १.०६ दलघमी जलसाठा आहे.
पाऊस तळ ठोकून
By admin | Published: June 22, 2015 12:35 AM