जिल्हाधिकाऱ्यांची भेट : तहसीलमध्ये घेतली बैठकसडक अर्जुनी : तालुक्यातील मौजा कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या गावांचे पुनर्वसन सौंदडजवळील श्रीरामनगर येथे सन २०१२-१३ ला करण्यात आले. पुनर्वसनाचा परिपूर्ण फायदा आम्हाला मिळाला नाही म्हणून पुनर्वसनग्रस्त आपल्या स्वगावी परतले. त्यांनी दिलेल्या निवेदनाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दखल घेवून गुरूवारी (दि. १८ जून) तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत पुनर्वसनाच्या समस्यांचा तिढा कायमच राहीला.प्राप्त माहितीनुसार, मौजा कवलेवाडा, कालीमाती, झनकारगोंदी या जंगलव्याप्त गावांचे पुनर्वसन श्रीरामनगर येथे करण्यात आले असून शासनाकडून आम्हाला आश्वासनानुसार पूर्णवणे लाभ मिळाला नसून आमच्या काही समस्या आहेत त्या समस्या सुटल्या तरच आम्ही श्रीरामनगर येथे जावू अन्यथा आमच्या जुन्याच गावी राहणार, असा पवित्रा त्यांनी घेवून ३१६ कुटुंबे भर पावसात उघड्यावर राहायला गेली आहेत. त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये १० लाखापैकी ७ लाख रुपये मिळाले. १ हेक्टर जमीनपैकी एकही एकर मिळाली नाही असे सांगितले. ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींना मोबदला मिळाला पाहिजे अशा मागण्या घेवून बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) अशोक खुणो, उपविभागीय अधिकारी सूर्यवंश्ी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने, तहसीलदार मोटघरे, ठाणेदार केंद्रे, वनक्षेत्राधिकारी दोनोडे, ग्रामसमिती अध्यक्ष भरत पंधरे, जागेश्वर चांदेवार, किशोर शेंडे, राजू शिवणकर, रहेले उपस्थित होते. मात्र यावेळी अपेक्षित तोडगा निघाला नाही. (तालुका प्रतिनिधी)
पुनर्वसित श्रीरामनगरचा तिढा कायम
By admin | Published: June 19, 2015 1:27 AM