मागणी : कृषी अधीक्षकांना दिले निवेदन ंगोरेगाव : शेतातील जमिनीच्या माती परीक्षणाचा अहवाल संबंधित शेतकऱ्यांना आठ दिवसांत देण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील ग्राम गणखैरा येथील सहयोग एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात समितीने कृषी अधीक्षकांना गुरूवारी (दि.२) निवेदन दिले आहे. कृषी विभागाच्या वतीने व्यवस्थापन समितीकडून शेतीच्या परीक्षणासाठी सहल नेण्यात आली होती. या मातीचा परीक्षण अहवाल शेतकऱ्यांना मिळाल्यास त्यांना मातीत नत्र, स्पुरद, पालाशमध्ये कोणती कमतरता आहे किंवा कोणते घटक कमी वा जास्त आहेत, हे कळेल. यातून होणाऱ्या आर्थिक तोट्यापासून ते स्वत:ला वाचवू शकतील. यासाठी समितीच्या वतीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तीन महिन्यांनंतर माती परीक्षणाचा अहवाल येणार असल्याचे सांगितले. मात्र एवढा कालावधी लागणे योग्य नसून या कालावधीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार. यासाठी माती परीक्षणाचा अहवाल आठ दिवसांत शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, अशी मागणी समितीने कृषी अधीक्षकांना निवेदन देऊन केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अहवाल आठ दिवसांत द्या
By admin | Published: July 06, 2015 1:32 AM