तिरोडा : केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता. आता ओबीसी आरक्षण रद्द होण्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर भाजप जनतेची दिशाभूल करीत आहे. मंडल आयाेग आणि आरक्षणाला कुणाचा विरोध होता ही बाब जनतेला चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे जनतेला खोटी आणि मोठी स्वप्ने दाखवून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करा, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
तिरोडा येथील कुंभारे लॉन येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी खा. खुशाल बोपचे, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, गंगाधर परशुरामकर, लोकपाल गहाणे, प्रेमकुमार रहांगडाले, मनोज डोंगरे, कैलास पटले, सुनीता मडावी, किशोर तरोणे, रविकांत बोपचे, नीता रहांगडाले, रफिक खान, जया धावडे, डॉ. अविनाश जायस्वाल, जिब्राईल खा. पठाण, नरेश कुंभारे, जगण धुर्वे, डॉ. किशोर पारधी, डॉ. सुशील रहांगडाले, प्रभू असाटी, यशवंत परशुरामकर, विजय बुराडे, राजू केशरवाणी उपस्थित होते. ना. नवाब मलिक म्हणाले, येत्या निवडणुकांमध्ये खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे सांगितले. राजेंद्र जैन म्हणाले, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे हात बळकट करण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने काम करण्यास सांगितले.