सालेकसा : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाची सरासरी कमी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मानसूनचे आगमन झाले असले तरी सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा दिसून येत आहे. काही ठिकाणी पाऊस अधिक तर काही ठिकाणी कमी दिसत आहे. त्यामुळे पेरणी लवकर करावी की थोडा उशीराने करावी या संभ्रमात अनेक शेतकरी सापडले आहेत. अनेक लोक सावध पवित्रा घेवून पेरणी करीत आहेत. त्यामुळे सालेकसा तालुक्यात आतापर्यंत फक्त १० ते १५ टक्के पेरणी झालेली आहे.मृग नक्षत्राला चार दिवस उरले असले तरी नक्षत्र संपेपर्यंत सालेकसा तालुक्यात २० ते २५ टक्के पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात फक्त खार पेरणीचे प्रमाण राहणार आहे. पावसाची अनियमितता पाहून अनेक शेतकरी या वर्षी आवत्या पेरणीच्या विचार करीत आहेत. मात्र या बद्दल आता आवत्या की पेरणी करायची अश्या सं्रमात अनेक शेतकरी आहेत.सालेकसा तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून व लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून एक छोटा तालुका असला तरी या तालुक्याची शेतजमीनीत वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते. त्यानुसार या तालुक्यात कमी अधिक कालावधीची पीक घेण्यात येत आहे. या तालुक्यातील जमिनीत उर्वरक क्षमता सुद्धा कमी असून पीक उत्पादनाचे प्रमाण कमी असते. विशेष म्हणजे या तालुक्यातील शेतकरी फक्त धानपिक घेण्यावर विश्वास ठेवतो. धानपिकाला जेवढे जास्त पाणी मिळेल तेवढे चांगले मानले जाते. परंतु पाऊस कमी झाला की पीकावर मोठा परिणाम सुद्धा होतो. सालेकसा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती ही वरथेंबी पावसावर अवलंबून असते. वेळेवर पेरणी करून ही सुरुवातीला पाऊस आला आणि मधात दडी मारली तर पऱ्हे सुकण्याची भिती असते. जर पेरणी उशीरा केली तर रोवणीची वेळ येताना पऱ्हे रोवणी योग्य होत नाही. अशा द्विधास्थितीत वरथेंबी पावसावर अवलंबित शेतकरी असतो याचाच फटका शेतकऱ्यांना बसतो. दुसरे कारण म्हणजे येथे जमिनीत ओलसर पणा जास्त दिवस टिकून राहत नाही आणि पाण्याची वेळोवेळी गरज भाषत असते ही सर्व परिस्थिती बघून शेतकरी पेरणी करित आहेत. (प्रतिनिधी)
पेरणीच्या कामाला वेग
By admin | Published: June 21, 2015 1:09 AM