४० टक्क्यांचा निकष : जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची चाचणीगोंदिया : विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत व भाषा विषयाच्या संपादनात सातत्याने घसरण होत असल्याने त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी चाचणी घेण्यात येत आहे. या पायाभूत चाचणीत ४० टक्यापेक्षा कमी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला अप्रगत समजले जाणार आहे. यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ३ लाख ५६ हजार प्रश्नपत्रिकांची मागणी केली आहे.शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या क्षमतांची संपादणूक प्रभूत्व पातळी वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्याना भाषेचा एक पेपर तर गणित विषयाचा एक पेपर या पायाभूत चाचणीत दिला जाणार आहे. विद्यार्थ्यानी वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, शैक्षणिक गुणवत्ता विकासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, संपादणूक पातळी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक पायाभूत चाचणी व संकलित मुल्यमापनाच्या दोन अशा तीन परीक्षा घेण्यात येणार आहेत. सदर चाचण्या आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतल्यानंतर संकलीत मुल्यमापन सत्रात एक व दोन वेळा दृच्छिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी लक्ष द्यावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी जी.एन. पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पायाभूत चाचणीतून शोधणार अप्रगत मुले
By admin | Published: August 19, 2015 1:59 AM