-अमृता कदम
तुम्ही जेव्हा प्रवासाला निघता तेव्हा वेगळ्या ठिकाणी गेल्यावर हवामानात होणारा बदल, खाण्या-पिण्यातले बदल, धावपळ याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. सर्दी-पडशासारख्या काही किरकोळ तक्रारींबरोबरच कदाचित काही गंभीर त्रासही होऊ शकतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्यांचाही रसभंग होतो. म्हणूनच प्रवास करताना थोडीशी काळजी घेतली तर तुमचा प्रवास आनंददायी आणि आरोग्यदायीही होईल.
जर्नी हॅपी होण्यासाठी
* प्रवास म्हणजे मौजमजा असली तरी तुमच्या रोजच्या व्यायामाला अजिबात फाटा देऊ नका. अगदी नेहमीसारखा नाही पण किमान अर्ध्या तासाचा व्यायाम चुकवू नका. तुमची राहण्याची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये आहे, तिथे जिम असेल तर तुमचं व्यायामाचं रूटिन मोडणार नाही. स्वीमिंग पूल सारखी सोय असेल तर मग पोहण्याचा आनंद आणि व्यायाम केल्याचं समाधान दोन्हीही पदरात पडेल. आणि अगदी काहीच नसेल तर सकाळी लवकर उठून मस्तपैकी जॉगिंगला तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. सकाळी अगदी स्वत:साठी काढलेला हा अर्धा तास तुम्हाला दिवसभराच्या प्रवासात एकदम ताजतवानं ठेवेल.
* प्रवासामध्ये भरपूर पाणी पित राहणंही अत्यंत गरजेचं आहे. फिरण्याच्या, वेगवेगळी ठिकाणं पाहण्याच्या गडबडीत पाणी पिलं जातंच असं नाही. पाण्याची बाटली वागवण्यापेक्षा अनेकजण लिमलेटच्या गोळ्या सोबत ठेवायला किंवा चटकन कोल्ड्रिंक विकत घेऊन प्यायला प्राधान्य देतात. या गोष्टींनी तात्पुरतं बरं वाटत असलं तरी पाण्याला कोणताही पर्याय नाही. विशेषत: तुम्ही जर उष्ण हवामानाच्या प्रदेशात गेला असाल तर योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनही होऊ शकतं. त्यामुळे प्रवासात फिट राहण्यासाठी पाणी मस्ट आहे.
* प्रवासामध्ये गाडी हाताशी असल्यानं बरेचजण चालायचं टाळतात. पण तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं त्या शहरामध्ये चालत फिरा. शहरातली ठिकाण, अगदी गल्ली-बोळ, तिथल्या बाजारपेठा पायी चालून पाहा. सहलीत अशी पायपीट बसून बसून जडावलेल्या शरीराला आणि प्रवासानं शिणलेल्या मनाला विरंगुळा देते.
* प्रवासामध्ये सतत काही ना काही खाणं (बऱ्याचदा ते अरबट-चरबट सदरात मोडणारंच असतं) सुरूच असतं. त्यामुळे खाणं झालंय ना असं म्हणत किंवा खूपदा भटकण्याच्या नादात जेवायंच राहून जातं. असं अजिबात करु नका. नाश्ता आणि दुपारचं जेवण शक्यतो टाळू नका. संध्याकाळी मग थोडंस हलकं काहीतरी खाल्लं तरी चालेल. प्रवासातलं खाण हे स्वच्छ आणि आरोग्यदायी असावं. प्रत्येकवेळी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं खायला मिळेलच असं नाही. त्यामुळे घरून निघताना थोडा कोरडा खाऊ सोबत ठेवावा. तसंच शक्य तेव्हा फळंही खावीत.
* प्रवासातली खाण्यापिण्यातली जी काही कमतरता असेल ती दूर करण्यासाठी आणि स्वत:ला उत्साही, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्याही घेऊ शकता. या गोळ्यांचे काही साइड-इफेक्टस नसतात. पण तरीही एकदा डॉक्टरांचा सल्लाही घेतलेला चांगला.
* भरपूर फिरताना योग्य ती काळजी घेतली नाही तर सगळ्यात जास्त नुकसान होतं ते तुमच्या त्वचेचं. शिवाय आजकाल वातावरणातले विविध घटक, खाद्यपदार्थ यांसरख्या गोष्टींची अॅलर्जी ही देखील खूप कॉमन गोष्ट झाली आहे. त्यामुळेच प्रवासात बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला आणि गॉगल्स घालायला विसरु नका. त्याचबरोबर कोरड्या हवेच्या ठिकाणी फिरायला गेला असाल तर तुमच्या त्वचेला योग्य प्रकारे मॉश्चराईजही करा. नाहीतर अशा ठिकाणी त्वचा कोरडी पडते. प्रवासाहून परत येताना सोबत घेऊन यायचे असतात ते आनंदाचे क्षण आणि मजेशीर आठवणी. आजारपण किंवा दुखणी नाही. म्हणूनच प्रवास करताना काही पथ्यं आवर्जून पाळली तर खऱ्या अर्थानं आपला प्रवास ‘हॅपी जर्नी’ होतो.