हिंगोली जिल्ह्यात कोरोनामुळे सध्या अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे पोषण आहार घरपोच देण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच वजनेही घेतली जात आहेत. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांतर्गत १ लाख ५४८ बालके ० ते ६ वर्ष वयोगटातील आहेत. यापैकी तीव्र कमी वजनाची बालके ९३१ असल्याचे आढळून आले आहेत. ७६१३४ बालके ही सर्वसाधारण श्रेणीत आहेत. ज्या बालकांना पोषण आहारानंतरही कुपोषणातून बाहेर काढण्यात यश आले नाही, अशांची संख्या २१८ एवढी आहे. त्यांच्यासाठी व्हीसीडीसी सुरू करण्यासाठी प्रस्तावित केले आहे. यात प्रकल्पनिहाय हिंगोली ३१, सेनगाव ३४, औंढा ना.२४, वसमत ४८, कळमनुरी ४३ तर आखाडा बाळापूर ३८ अशी मुलांची संख्या आहे.
दरवर्षीच जवळपास आठशे ते हजार मुले कुपोषणाच्या विळख्यात सापडत असल्याचे आढळून येत आहे. शासनाकडून पोषण आहाराचा पुरवठा केला जात असला तरीही मुलांमधील हे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात यश येत नाही. मागील काही वर्षांपासून वजन व उंचीवरून कुपोषणाचे निकष लावले जात आहेत. त्यानंतर कुपोषणाचे प्रमाण किती जास्त आहे, हे समोर येत आहे. या मुलांना पोषण आहारानंतरही त्यातून बाहेर काढण्यात अपशय आल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून व्हीसीडीसी सुरू केले जातात. या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मुलांना आहार दिला जातो. तसेच औषधोपचारांची गरज असल्यास तेही दिले जाते. शिवाय वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे प्रात्यक्षिकही दिले जाते. त्यामुळे नंतर फरक जाणवतो.