हिंगोली: दक्षिण भारताला उत्तर भारताशी सर्वात कमी अंतराचा आणि महत्त्वाच्या लोहमार्गावरील अकोला ते पूर्णा या २१० किलोमीटर अंतर असलेल्या विद्युतीकरण कामाने गती घेतली आहे. वाशिम रेल्वे स्टेशनपर्यंत हे काम पूर्ण झाले असून कनेरगाव स्टेशनपासून विद्युतीकरणासाठी लागणारे पोलचे खड्डे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाने २०१८ मध्ये अर्थसंकल्पात २११ कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद केली होती. हिंगोलीचे दिवंगत खासदार राजीव सातव यांनी लोहमार्गावरील विद्युतीकरणासाठी पुढाकार घेत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.
रेल्वेच्या अलाहाबाद येथील सेंट्रल ऑर्गनायझेशन फाॅर रेल्वे इलेक्ट्रीकल्समार्फत विद्युतीकरणाचे काम केले जात आहे. या संस्थेने निविदा प्रक्रिया राबवून 'केईसी' कंपनीला विद्युतीकरणाचे काम दिले आहे. दोन-अडीच वर्षात हे काम पूर्ण होईल, अशी रेल्वे विभागाला आहे. गत पाच-सहा दिवसांपासून हिंगोली येथील स्थानकावर विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पोलसाठी खड्डे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. विद्युतीकरणाचे सर्व साहित्यही रेल्वे स्थानकावर आणून ठेवण्यात आले आहे. या कामासाठी मजुरांची संख्या वाढविली असून कामाने गतीने घेतली असल्याचे पहायला मिळत आहे.
जुलै महिन्यात रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी हिंगोली येथील रेल्वे स्टेशनला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्युतीकरणाचे काम लवकरात लवकर आटोपते घ्यावे, अशा सूचना दिल्या होत्या.
वेळ व इंधन बचत होणार...
दक्षिण भारतातून नांदेड -पूर्णा-अकोला मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवासी आणि मालगाड्या सद्य:स्थितीत हैदराबाद ते अकोलापर्यत डिझेल इंजीनवर धावतात. अकोला ते पूर्णा विद्युतीकरण झाल्यास दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वे गाड्या उत्तर भारतात विद्युत इंजीनवर धावतील. यामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार आहे.
-रामसिंग मिना, स्टेशन मास्टर, हिंगोली.
फोटो १०