जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठकीत पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगाम सुरू होऊन २ महिने झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४४ टक्केच शेतकऱ्यांना पीककर्जाचे वितरण झाले आहे. बँका यात टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या बँका दिरंगाई करत आहेत, अशांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन गाव व बँकनिहाय आराखडा तयार करावा, तसेच त्यांना तात्काळ कर्ज वितरणाचे निर्देश देऊन दररोज याबाबत पाठपुरावा करावा. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ९१ हजार ४६६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५९४ कोटी ८६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
गायकवाड म्हणाल्या की, कोरोना उपाययोजनेच्या बाबतीत जिल्ह्याने चांगले काम केले आहे. तरी आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्ण तयारी करावी. कृषी विभागाचा आढावा घेताना गायकवाड यांनी जिल्ह्यासाठी किती बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या किती शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी विचारणा केली, तर तक्रार प्राप्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्याचा पंचनामा करावा आणि दोषीवर कायदेशीर कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे रोजगार गेल्याने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.