१७ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात, तर १८ ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
उपग्रहाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार सध्या मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला दिसून येत आहे, याचाच परिणाम म्हणजे वातावरण दमट होते. अशा वातावरणात किडींचा व रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात १८ ते २४ ऑगस्टदरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, तर किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पावसादरम्यान शेतकऱ्यांनी शेतातील कोणतीही कामे करू नयेत. तसेच झाडाखाली शेतकऱ्यांनी थांबू नये. कारण झाडावर वीज पडण्याची दाट शक्यता असते. पशुधनाला शेतकऱ्यांनी उघड्यावर बांधू नये, पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहनही ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने केले आहे.