जिल्ह्यात शनिवारी औंढा नागनाथ येथे जोराचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडल्याची घटनाही घडली. तसेच औंढा तालुक्यात जवळा बाजार, कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव, नांदापूर, आखाडा बाळापूर, कनेरगाव नाका, पोत्रा, नांदापूर, कोंढूर डिग्रस तसेच वसमत तालुक्यातील कौठा, हिंगोली शहर, फाळेगाव, बासंबा परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र या पावसाने अंबा फळांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी लगबग सुरू झाली. रविवारी सकाळपासूनच शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त होते. महिला मजुरांच्या साहाय्याने काडी कचरा वेचणी केली जात होती, तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर, जमिनीचे सपाटीकरण आदी कामे सुरू असल्याचे दिसत होते. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद लागवड केली असून, ठिबकच्या साहाय्याने पाणी देता यावे, यासाठी ठिबक अंथरले जात होते.
चाऱ्याची जमवाजमव
खरीप पेरणीच्या काळात पशुधनाची गैरसोय होऊ नये, यासाठी शेतकरी चाऱ्याची आतापासूनच जुळवाजुळव करीत असल्याचे दिसत आहे. शेतातील कडबा, कुटार, भूईमुगाचे काड बैलगाडीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवले जात आहे.