कोरोना महामारीमुळे एस. टी. महामंडळाला तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. त्यातच डिझेलचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत आगारातील बसेस या डिझेलअभावी बंद होत्या. सद्यस्थितीत तिन्ही आगारांमध्ये डिझेल आहे. त्यामुळे बसेस धावू लागल्या आहेत. डिझेलसाठी एस. टी. महामंडळ पाठपुरावा करीत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण भाग वगळता सर्व बसेस सुरू
ग्रामीण भाग सोडला तर आज जिल्ह्यात सर्व बसेस वेळेवर धावत आहेत. कोरोना महामारीचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे अजूनही प्रवासी प्रवास करण्यास पुढे येत नाहीत. काही प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करत आहेत. परिणामी एस. टी. महामंडळाला म्हणावा तसा नफा होत नाही. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना एस. टी. महामंडळाला सामोरे जावे लागत आहे.
प्रतिक्रिया..
डिझेलसाठी केला जातो पाठपुरावा
दोन दिवसांपूर्वी डिझेलअभावी कळमनुरी व वसमत येथील बसेस आगारात लावाव्या लागल्या होत्या. आता तशी वेळ येणार नाही. कारण महामंडळ डिझेलसाठी पाठपुरावा करत आहे.
गत वर्षापासून डिझेलचे भाव वाढले आहेत. असे असले तरी एस. टी. महामंडळ प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. डिझेलचे टँकर वेळेवर आले नाहीत तर एखादेवेळी बसेस आगारात लावाव्या लागत आहेत. एवढे असतानाही प्रवाशांची गैरसोय मात्र होऊ दिली जात नाही.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख