यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्गप्रेमी साहित्यिक मारुती चित्तमपल्ली तर चित्रपट अभिनेता भाऊ शिंदे, साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव, मुख्यमंत्री सचिवालयाचे सिध्देश्वर मोकाशे यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या, फळ लागलेले वृक्ष जसे झुकते तसे वृक्षाप्रमाणे जीवनात नम्रतेने वागायला शिकले पाहिजे. पुस्तकाबरोबरच निसर्गाचे ज्ञान अवगत करण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. ही निसर्ग शाळा सर्वसामान्य मुलांपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करावे. छंद हा शिक्षणाशी जोडला पाहिजे. छंदाबरोबरच ज्ञान मिळाले पाहिजे. जीवन वायू म्हणजे ऑक्सिजन झाडापासून मिळतो. लहानपासून मुलावंर संस्कार होत असल्यामुळे त्यांना कर्तृत्व सिद्ध् करता येणार आहे. ही निसर्ग शाळा सौदी अरेबियापर्यंत पोहोचली आहे. अशीच प्रगती सुरु ठेवण्यासाठी काही मदत लागल्यास ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही गायकवाड यांनी दिले.
प्रास्ताविकात अण्णा जगताप यांनी या शाळेत १३०० विद्यार्थी निसर्गाचे मोफत धडे घेत आहेत. विद्यार्थी, पालकांची निसर्गाविषयी आवड व काळाची गरज लक्षात घेऊन निसर्ग शाळा ॲपची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, निसर्ग शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.