हिंगोली: अनादी काळापासून नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागाला (साप) दूधही पाजले जाते. मग इतर दिवशी नागाला का मारले जाते, असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा नागरिकांनी साप (नाग) दिसल्यास सर्पमित्रांची मदत घेऊन त्याला जंगलात नेऊन सोडणे गरजेचे आहे. कारण साप हा शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र आहे. तो शेतातील पिकांना वाचविण्यासाठी एक प्रकारे मदतच करतो.
जिल्ह्यात विषारी साप हे चार प्रकारचे आढळून येतात. यामध्ये मणियार, फुरसे, घोणस आणि नाग असे हे प्रकार आहेत. बिनविषारी साप हे जवळपास १५ प्रकारचे आहेत. यामध्ये धामण, कुकरी, दिवड, धूळ धामीण, तस्कर, नॅनेटी, ढोरक्या घोणस, कवड्या आदी साप आहेत.
जिल्ह्यातील विषारी साप ४
बिनविषारी साप १५
साप आढळला तर...
घराचा परिसर असो, शेत असो किंवा इतर मोकळी जागा असो. कुठेही साप आढळून आला तर त्याला मारू नका. भीती वाटत असेल तर लांब काठीने त्यास इतरत्र ढकलून सर्पमित्रांना बोलावून घ्यावे. यानंतर सर्पमित्र त्या सापाला अलगदपणे जंगलात नेऊन सोडण्याचे काम करतील.
-मुरलीधर कल्याणकर, सर्पमित्र
साप हा शेतकऱ्यांचा मित्र...
शेतातील पिकांना हानी पोहोचविणारे काही प्राणी आहेत. यामध्ये घुस, उंदीर आदींचा समावेश होतो. सापाचे खाद्य दूध नसून शेतातील किंवा घराच्या आसपास आढळणारे हे छोटे प्राणी आहे. साप या छोट्या प्राण्यांना खाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची मदत करतो, त्यामुळे सापाला कोणीही मारू नका.
-विश्वंभर पटवेकर, सर्पमित्र
नागपंचमी साजरी करा... पण सापाला मारू नका
नागपंचमी सण साजरा करा. पण सापाला दूध पाजू नका. कारण दूध हे सापाचे खाद्य नाही. नागपंचमीच्या दिवशी साप आढळल्यास सर्पमित्राला बोलावून त्याच्या स्वाधीन करावे. नागपंचमी साजरी करायची झाल्यास नागाचे चित्र काढून साजरी करा. सापाला पूजा करतेवेळेस वेदना झाल्यास तो दंश करण्याची शक्यता असते. अशावेळी नाग हा विषारी की बिनविषारी हे सर्वसाधारण माणसाला कळत नसते, असे सर्पमित्रांनी सांगितले.