हिंगोली: नगरपरिषद व नगरपंचायत संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर येत्या १५ दिवसांत विचार करून त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन नगरविकास प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिले.
१३ ऑगस्टला मुंबई येथील आझाद मैदानावर नगरपरिषद कर्मचारी, महापालिका व नगरपंचायतच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पोलीस प्रशासन व नगरविकास प्रधान सचिवांशी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. चर्चेअंती प्रलंबित मागण्या पंधरा दिवसांत सोडविल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले. यासाठी पदाधिकाऱ्यांसमवेत व्हीसीद्वारे चर्चा करण्यात येऊन मागण्या निकाली काढल्या जातील, असेही सांगण्यात आले. यापूर्वी आयुक्त, नगरविकासचे प्रधान सचिवांनी बहुतांश मागण्या मार्गी लावल्या आहेत. काही मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असल्यामुळे आझाद मैदानावर आंदोलन करावे लागले. यावेळी मार्गदर्शक के. के. आंधळे, अध्यक्ष डी. पी. शिंदे, भगवान बोडके, खुशबू चौधरी, योगीराज अरखेल, प्रीतम सोनटक्के, अंकुश भराड, दत्ता गायकवाड, सचिन कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.