हिंगोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संतोष बांगर, नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. गोपाल कदम, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी उपस्थित होते. यावेळी सामंत म्हणाले की, पारंपरिक शिक्षणासोबतच व्हर्च्युअल क्लासरुमची संकल्पना पुढे आणली जाणार आहे. यासाठी गोंडवाणा, पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विद्यापीठात सॅटेलाइट सेंटर सुरू केले जाणार आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळेल. राज्यात प्राध्यापकांच्या ६४०० जागा भरण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी १६०० जागा कोविडपूर्वी भरल्या आहेत. आता ३०७४ जागा भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे. कोविड कमी झाल्यानंतर या जागा भरल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून जिल्हा रुग्णालयास सीएसआरमधून प्राप्त झालेल्या आठ व्हेंटिलेटरचे लोकार्पणही सामंत यांनी केले, तर व्हेंटिलेटरवर जाण्याची वेळ कुणावरही येऊ नये. मात्र मिळालेल्या सुविधांचा चांगला वापर करण्याचे आवाहन केले. तसेच कोरोनाच्या काळात आमदार बांगर यांनी आदर्शवत काम केले. रेमडेसिविरसाठी त्यांनी स्वत:ची एफडी मोडून सामान्यांसाठी झटणारा सच्चा शिवसैनिक असल्याचे दाखवून दिले, असेही ते म्हणाले.
सीईटीला मुदतवाढ
राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने सीईटीचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मागणी झाल्यास पुन्हा मुदतवाढ दिली जाईल. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही सामंत म्हणाले.