हिंगोली : खरीप ज्वारी पिकामध्ये हलकी कोळपणी करावी. जेणेकरून पिकातील तणाचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.
ज्वारी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास पाणी द्यावे. तसेच ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम १२.६ टक्के, लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५, झेडसी ५ मिली किंवा स्पीनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करून घ्यावी. फवारणी करताना कीटकनाशक पोंग्यात पडेल, अशा प्रकारे फवारणी करावी.
हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव असल्यास १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस २५ टक्के २० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टीकरसह फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून ठेवावे, असे आवाहनही कृषी विद्यापीठाने केले आहे.