हिंगोली : प्रत्येकजण ऑनलाईन झाल्याने आकाराने मोठा डिस्प्ले असलेला मोबाईल वापरण्याची क्रेझ आली आहे. मात्र असे मोबाईल एकतर हातात बसत नाहीत, दुसरे खिशातही मावत नाहीत, त्यामुळे हे मोबाईल चोरट्यांसाठी सोयीचे ठरत आहेत. असे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. ग्राहकांची असलेली मागणी लक्षात घेता, विविध कंपन्या मोबाईल उत्पादन क्षेत्रात उतरल्या आहेत. सर्व व्यवहार मोबाईलवर होत असल्याने विविध ॲप असलेल्या मोबाईलला पसंती देत आहेत. आता ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते मोबाईलवर चित्रपट पाहणे, फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांचा वापरही केला जात आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण मोठ्या आकाराचा डिस्प्ले असलेला मोबाईल वापरत आहेत. मात्र आता असे मोबाईलच चोरट्यांच्या सोयीचे ठरत आहेत. असे मोबाईल एकतर हातात बसत नाहीत. खिशात ठेवावे, तर खिशातही मावत नाहीत. त्यामुळे हातात मोबाईल ठेवावा लागत आहे. चोरटे हीच संधी साधून हातातून मोबाईल हिसकावून घेऊन जाण्याची शक्यता वाढत आहे. अनेकवेळा असे मोबाईल विसरले जात आहेत.
चोरी नव्हे, गहाळ म्हणा
-चोरीला गेलेल्या मोबाईलची तक्रार पोलीस ठाण्यात द्यायला गेल्यास अशी तक्रार घेण्यास जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात टाळाटाळ केली जात आहे.
- तक्रार घेण्याचा आग्रह केल्यानंतरही त्यात मोबाईल गहाळ झाल्याचा उल्लेख करावा लागत असल्याचा अनेकांचा आरोप आहे.
- मोबाईल चोरीला गेल्याऐवजी गहाळ झाल्याची नोंद होत असल्याने असे मोबाईल शोधण्याकडेही कानाडोळा होत आहे.
- परिणामी मोबाईल चोरीला गेल्यानंतरही परत मिळण्याची शक्यता कमीच असते.
या भागामध्ये मोबाईल सांभाळा...
- हिंगोली शहरातील गांधी चौक बाजार भागात मोबाईल चोरीला गेल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.
- त्यानंतर रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा उचलत चोरटे सहज मोबाईल लांबवित आहेत.
- जवाहर रोड यासह गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळून ठेवणे गरजेचे बनले आहे.
हिंगोली शहरातील मोबाईल चोरीच्या घटना
चोरीला गेलेले, गहाळ झालेले मोबाईल
२०२०-०४ ७१
२०२१ -०१ ५७