हिंगोली: क्षयरोग अर्थात टीबी या रुग्णास शासनाच्या निर्देशानुसार उपयुक्त आहारासाठी दरमहा पाचशे रुपयाप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे टाकले जातात. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४५० क्षयरोगी आहेत. या सर्व ४५० क्षयरुग्णांना उपयुक्त आहारासाठी घरबसल्या पैसे खात्यात टाकण्याची शासनाने व्यवस्था केली आहे. काही अडचण, औषधोपचार घरी जावून केला जातो. तांत्रिक अडचण आल्यास त्यांच्याकडून पासबुकची सत्यप्रत मागवून घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यात येतात. लहान मुलांचे खाते नसेल तर त्यांच्या पालकांच्या खात्यात पैसे टाकण्याची व्यवस्थाही केली जाते.
जिल्ह्यातील क्षयरोगी ४५०
भत्ता किती जणांना दिला जातो ४५०
आहार भत्ता न मिळणाऱ्यांचे प्रमाण ००
टीबीची लक्षणे...
वारंवार ताप येणे, वजन कमी होणे, खोकला वारंवार येणे आदी क्षयरोगाची लक्षणे आहेत. यासाठी वेळीच जवळच्या केंद्राशी किंवा फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार घ्यावा. हा आजार अंगावर काढू नये. कारण कोणताही आजार अंगावर काढल्यास तो वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.
९५० क्षयरुग्ण मुक्त...
टीबी हा दोन प्रकारचा असतो. पहिला टीबी औषधोपचाराला दाद न देणारा असून, त्यासाठी दुरुस्त होण्यासाठी २८ महिने लागतात. तर दुसरा टीबी हा औषधोपचाराला दाद देणारा असतो. तो सहा महिन्यांमध्ये बरा होतो. तेव्हा क्षयरुग्णांनी प्रकृतीची काळजी घेत डॉक्टरांनी दिलेले औषध वेळेवर घेणे हाच एकमेव पर्याय आहे. गतवर्षी १०५० क्षयरुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ९५० बरे झाले आहेत.
प्रतिक्रिया...
शासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार क्षयरुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जाते. शासनाने दिलेल्या सुचनेप्रमाणे त्यांच्या खात्यात ५०० रुपये टाकले जातात. रुग्णांच्या सेवेसाठी रवींद्र घुगे, बालाजी उबाळे, राजू पुंडगे, प्रसाद कुलकर्णी, सुरेश कांबळे, पवार आदी कर्मचारी कार्यरत आहेत.
-डॉ. जी. एस. मिरदुडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, हिंगोली