गावातल्या निवडक विहिरींच्या पाणीपातळीचे बारीक निरीक्षण, पीकपद्धती ठरवण्यासाठी दिशा दाखविणे, जलव्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही माहिती गोळा करण्याचे काम सध्या पानी फाउंडेशनच्या मदतीने सुरू आहे. पानी फाउंडेशनतर्फे उपलब्ध केलेल्या ऑनलाईन फॉर्मवर प्रत्येक जलमित्र विहिरीचे लोकेशन, विहिरीची खोली, पाणी पातळीचे मोजमाप आदी माहिती भरण्यात येत आहे. या माहितीच्याआधारे ग्रामस्थ गावातील विहिरींची पाणी पातळी मोजत आहेत. प्रत्येक हंगामाआधी व नंतर पाणी पातळीचे मोजमाप केले जाणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये पाणी पातळीच्या मोजमापाला सुरुवात झाली होती. मार्चमध्ये रब्बी हंगामानंतर व उन्हाळी हंगामाआधी एकदा पाणीपातळी मोजली जाणार आहे. आतापर्यंत तालुक्यातील जरोडा, वारंगा, मसाई बोल्डावाडी, नवखा, शिवनी खुर्द, सालेगाव, रामवाडी, कवडा, सिदगी, चिंचोर्डी, मसोड या गावांतील ११९ विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली.
यानंतर आता मे महिन्यात उन्हाळी हंगामानंतर आणि खरीप हंगामाआधी पाणी पातळी मोजली जाणार आहे. प्रत्येक हंगामाआधी विहिरीत किती पाणी आहे, याचे मोजमाप केल्यानंतर कोणते पीक घ्यावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या हंगामानंतर पुन्हा विहिरीतील पाणीपातळी मोजले की आपण जे पीक निवडले, त्यामुळे पाण्याच्या पातळीत किती घट झाली, याची नोंद करण्यात येणार आहे. त्यानुसार आपली पीक निवड योग्य होती की नाही, याबद्दल आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.
फाेटाे नं.२४