फिलीपिन्सनंतर आता व्हिएतनामही भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा आशिया खंडातील दुसरा देश बनणार आहे. ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कराराची (डीलची) एकूण किंमत सुमारे ७०० मिलिय डॉलर्स अर्थात अंदाजे ५९९० कोटी रुपये एवढी असू शकते. या करारावर लवकरच मोठा निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
फिलीपिन्सप्रमाणेच व्हिएतनामचाही दक्षिण चीन समुद्रातील सागरी सीमेवरून चीनसोबत वाद आहे. यामुळे व्हिएतनाम आपले सैन्य बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांत भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील लष्करी संबंध अधिक दृढ झाले आहेत.
तत्पूर्वी, फिलीपिन्सने भारतासोबत ३७५ मिलियन डॉलर्समध्ये तीन ब्रह्मोस क्षेपणास्त्र बॅटरींसाठी डील केली होती. आता भारताने फिलीपिन्सला या क्षेपणास्त्रांचा पुरवठाही सुरू केला आहे. यानंतर आता, व्हिएतनामसोबतचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारही अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे बोलले जाते. याच बरोबर, या क्षेपणास्त्रासंदर्भात इंडोनेशियाशीही चर्चा सुरू आहे. हा करार सुमारे ४५० मिलियन डॉलर्सचा असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय मध्य आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांनीही ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
600 किलोमीटरपेक्षाही अधिक रेंज असणार -पूर्वी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारा क्षमता २९० किमी होती, मात्र आता ती, आणखी वाढवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय शास्त्रज्ञ या क्षेपणास्त्राची मारक क्षमता अथवा रेंज ४०० ते ६०० किलोमीटरपर्यंत करण्यासाठी काम करत आहेत. नुकतेच, भारतीय हवाई दलाने सुखोई लढाऊ विमानातून ब्राह्मोस एक्सटेंडेड रेंजची यशस्वी चाचणी केली, याची स्ट्राइक रेंज ४०० किलोमीटरपेक्षाही अधिक होती.
चीनसाठी धोक्याची घंटा -दक्षिण चीन समुद्र आणि त्याच्या जवळपासच्या भागातील देशांना चीन सातत्याने धमकावत असतो. तो अनेक वेळा, या देशांच्या विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) अर्थात विशेष सागरी क्षेत्रातही हस्तक्षेप करतो. २००९ पासून चीन आणि फिलीपिन्समधील संबंधही अधिकच बिघडले आहेत. चीनने एक नवीन नकाशा जारी केला आहे. यात त्यांनी ९-डॅश लाइन बनवून दक्षिण चीन समुद्राचा एक मोठा भाग आपला असल्याचा दावा केला आहे. यात फिलीपिन्समधील अनेक बेटे आणि EEZ च्या काही भागाचा समावेश आहे. चीनच्या या दादागिरीमुळे फिलीपिन्स, व्हिएतनाम, तैवान आणि मलेशियासारख्या देशांच्या सागरी भागावर कब्जा होण्याचा धोका वाढला आहे. अशा स्थितीत, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र या देशांसाठी एक मजबूत सुरक्षा कवच सिद्ध होऊ शकते.