बीजिंग : भारतासाठी चीन हा महत्त्वाचा देश असून प्रलंबित मुद्दे सोडविण्यासाठी चिनी नेत्यांशी सहकार्याने काम करण्याची तसेच परस्पर संबंधातील मुद्यावर चर्चा करण्याची आपली इच्छा आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांना सांगितले. परराष्ट्र धोरणात चीनला प्राधान्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. पंतप्रधान ली यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना गुरुवारी दूरध्वनी केला व भारताच्या नव्या सरकारबरोबर सहकार्याने काम करण्याची चीनची इच्छा असल्याचे सांगितले. यावर पंतप्रधान मोदी यांनी ली यांचे आधी पाठवलेल्या अभिनंदनाच्या संदेशासाठी आभार मानले. आमच्या संपूर्ण क्षमतेनिशी आम्ही चीनला सहकार्य करू, तसेच चीनच्या नेत्यांशी सर्व मुद्यावर चर्चा करू, असे मोदी यांनी सांगितल्याचे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या विकासाचे लक्ष्य साध्य व्हावे तसेच दोन्ही देशांतील जनतेला दीर्घकाळ विकासाचे लाभ मिळावेत, असे सांगून मोदी यांनी दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याचे स्वागत केले. मोदी व केकियांग यांनी नेहमी परस्पर संवाद ठेवण्याचे मान्य केले आहे. मोदी यांनी याचवेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. भारताच्या परराष्टÑ धोरणात चीनला नेहमीच प्राधान्य असेल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे. याआधी निवडणूक निकालात भाजपाला विजय मिळाल्यानंतर चीनने अभिनंदनाचा संदेश पाठविला होता, तसेच भारताचे चीनमधील राजदूत अशोक के कांथा यांच्यामार्फत विशेष संदेशही पाठवला होता. चीन व भारत हे शेजारी देश असून, जगातील मोठ्या बाजारपेठा आहेत. चीन व भारत संबंध अलीकडे बरेच विकसित झाले आहेत. (वृत्तसंस्था)
परराष्ट्र धोरणात चीनला प्राधान्य
By admin | Published: May 30, 2014 3:08 AM