जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यामुळे पूर्ण देशभरात दहशतीचे वातावरण आहे. या हल्ल्यावरुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आता या हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली आहे.
या हल्ल्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नाकारतो.
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान
ख्वाजा आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले. या हल्ल्यामागे भारतातील लोकांचा हात आहे. भारतात, नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत, लोक सरकारच्या विरोधात आहेत, असंही ते म्हणाले.
ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारत सरकार लोकांच्या हक्कांची हत्या करत आहे. ते त्यांचे शोषण करत आहेत. म्हणूनच लोक त्यांच्या विरोधात उभे आहेत. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले आहे की, पहलगाममध्ये घडलेल्या अशा घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. मी अशा हल्ल्यांचा निषेध करतो. विशेषतः नागरिकांवर असे हल्ले होऊ नयेत, असंही ते म्हणाले.
लष्कर प्रमुखांनी दिले प्रक्षोभक भाषण
"भारताचे सध्याचे सरकार तेथे राहणाऱ्या अल्पसंख्याकांना त्रास देत आहे. यामध्ये बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा समावेश आहे. लोकांची कत्तल केली जात आहे. लोक याविरुद्ध आवाज उठवत आहेत", असा गंभीर आरोप संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी केला.
काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी एक विधान केले होते. हे विधान आता काल झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांनी काश्मीरला त्यांच्या देशाची जीवनरेखा असल्याचे वर्णन केले होते. १६ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, “ही आमची नस होती आणि राहील. आम्ही हे विसरणार नाही. भारतीय कब्जाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना एकटे सोडणार नाही", काल झालेल्या हल्ल्यानंतर आता त्यांचे हे विधान पुन्हा व्हायरल झाले आहे.