नवी दिल्ली: भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी(दि.8) दुबईत अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्तकी यांच्याशी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, बैठकीत अफगाणिस्ताननेभारताच्या सुरक्षेच्या चिंतेबद्दल आपली संवेदनशीलता अधोरेखित केली. भारत नजीकच्या भविष्यात अफगाणिस्तानसोबत मानवतावादी सहाय्य कार्यक्रमांसोबतच विकास प्रकल्पांमध्येही सहभागी होण्याचा विचार करेल.
अफगाणिस्तानला मानवतावादी मदत करण्याच्या उद्देशाने व्यापार आणि व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सहकार्यासाठी चाबहार बंदराचा वापर करण्यास देखील सहमती दर्शविली गेली आहे. अफगाणिस्तानच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून भारत पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात आणि निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी आणखी मदत करेल. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, परराष्ट्र सचिवांनी अफगाण लोकांसोबतची भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांना अधोरेखित केले.
भारताचे अफगाणिस्तानला प्राधान्य भारत आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये अफगाणिस्तानशी असलेल्या संबंधांना प्राधान्य देत असल्याचे दोन्ही देशांमधील या भेटीतून सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवण्याचे जाहीर केले आहे.