Myanmar Earthquake News:भूकंपाच्या प्रकोपाने म्यानमार कोलमडला आहे. प्रचंड जीवित आणि वित्त हानी झाली आहे. दोन प्रलयकारी भूकंपाच्या झटक्याने हादरलेल्या म्यानमारसाठी जगभरातून मदतीचे हात पुढे आले आहेत. भारतानेही म्यानमारला मदत पाठवली असून, यात खाद्यपदार्थ, राहण्यासाठी टेंट आणि स्लिपिंग बॅगसोबतच इतरही साहित्य पाठवले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भूकंपाच्या झटक्याने म्यानमारमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. अतिशय तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनी हाहाकार माजला आहे. भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा हाती घेतले असून, मोठ्या प्रमाणात मदत रवाना केली आहे.
भारताने म्यानमारला काय काय पाठवले?
शनिवारी सकाळी भारतीय हवाई दलाच्या तळावरून ऑपरेशन ब्रह्मा हाती घेण्यात आले. या माध्यमातून १५ टन मदत साहित्य म्यानमारला पाठवण्यात आले. हे साहित्य सामग्री भारतीय हवाई दलाच्या सी १३० जे या विमानाने म्यानमारला पोहोचली.
हेही वाचा>>बँकॉकसारखा भूकंप महाराष्ट्रात झाला तर...; चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र...
यात टेंट, स्लिपिंग बॅग, चादरी, खाण्यासाठी तयार केलेले अन्न पदार्थ, पाणी शुद्धीकरण यंत्र, स्वच्छता किट्स, सौर दिवे, जनरेटरचे सेट आणि अत्यावश्यक औषधी यांचा समावेश आहे.
पहिली खेप यांगून शहरात उतरली
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, "ऑपरेशन ब्रह्मा माध्यमातून म्यानमारमधील भूकंपग्रस्त लोकांना मदत साहित्य पाठवले जात आहे. १५ टन साहित्याची पहिली खेप यांगूनमध्ये पोहोचली आहे.
म्यानमारमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी ११ वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी होती. या भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील मांडले शहरात होते. हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचे हादरे थायलंड, भारत, बांगलादेश आणि चीनपर्यंत जाणवले.