ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ - आरोप व प्रत्यारोपांनी काहीही साध्य होणार नाही असं सांगताना अविश्वासाला आपण मूठमाती द्यायला हवी अशी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. शरीफ यांनी भारतीय पत्रकारांचे प्रश्न न ऐकता केवळ त्यांना आपल्या भावना सांगितल्या, त्यामुळे लष्कर-ए-तय्यबा, दाऊद इब्राहिम अथवा मुंबई हल्ल्यासंदर्भातली पाकिस्तानची कारवाई या संदर्भात त्यांच्या मुखातून कुठलाही ठोस शब्द ऐकायला मिळाला नाही.
अर्थात, भारतीय सरकारसोबत चर्चा सुरू राहील आणि सगळ्या मुद्यांबाबत बोलण्यास पाकिस्तान तयार असल्याचे सकारात्मक स्पष्टीकरण त्यांनी दिले. मोदींबरोबर अत्यंत सामंजस्यपूर्ण बैठक झाल्याचे सांगताना दोन्ही देशांनी आरोप प्रत्यारोप टाळायला हवेत आणि अविश्वासाचे राजकारण करायला नको असे मत त्यांनी मांडले.