ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ३० - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लख्वी याला पाकिस्तान सरकारने दुस-या एका प्रकरणात पुन्हा ताब्यात घेतल्याने त्याचा तुुरुंगवास अटळ आहे. त्याच्या वकिलांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी निलंबित केला होता, त्यानंतर त्याची सुटका होणार होती. मात्र याप्रकरणी भारताने आपली नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली होती. आता पाक सरकारने दुस-या प्रकरणी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे.
२६/११च्या खटल्यात इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने पुराव्यााअभावी १८ डिसेंबर रोजी लख्वीला जामीन मंजूर केला होता, त्यावर चौफेर टीका होऊ लागल्याने सरकारने त्यास सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध केले होते. त्यामुळे जामीन मिळूनही लख्वी तुरुंगातून सुटू शकला नव्हता. या आदेशाविरोधात लख्वीच्या वकिलांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता न्यायालयाने स्थानबद्धतेचे हे आदेशच निलंबित करून लख्वीच्या सुटकेच्या मार्गातील अडसर हटवला होता. मात्र पाकिस्तान सरकारने आता त्याला दुस-या प्रकरणात ताब्यात घेतले असून आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नाही.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते.