इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भारत दौर्याबाबत पाक सरकार आशावादी असले, तरीही पाक प्रसारमाध्यमे मात्र दौरा यशस्वी ठरला किंवा नाही, याबद्दल संशय व्यक्त करीत आहेत. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सार्क नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावून आंतरराष्टÑीय पातळीवर स्वत:ची सकारात्मक प्रतिमा बनवली; पण त्यापेक्षा जास्त काही साध्य झाले नाही, असा प्रसारमाध्यमांचा सूर आहे. पाक - भारत बहुतांश मुद्दे जुनेच या मथळ्याखाली डॉन वृत्तपत्राने या दौर्याचे विश्लेषण केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वीच शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी पावले उचलली व यात सुरक्षेचा जुना मुद्दा बाजूला पडला. शरीफ यांनी दिल्लीत फील गुड या घटकाचा चांगला वापर केला, असे डॉनने आपल्या संपादकीयात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरीफ यांच्या भेटीची छायाचित्रे भारतीय प्रसारमाध्यमांनी वापरली; पण या भेटीतील चर्चेत अधिक स्पष्टता हवी होती, असे भारतीय जनतेचे मत होते. भारताला दहशतवादावर अधिक भर देण्याची इच्छा आहे, तर पाकिस्तानला जुन्या समस्या सोडवाव्यात असे वाटते, असे या संपादकीयात म्हटले आहे. दोन्ही पंतप्रधानांनी शांततेचा जुनाच राग आळवला आहे; पण ते खरेच शक्य आहे काय? असा प्रश्न या लेखात विचारण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानशी सुरळीत संबंध ठेवण्याची इच्छा खरोखर आहे काय? त्यासाठी ते पुढाकार घेतील काय? असाही प्रश्न येथे विचारण्यात आला आहे. नवाज शरीफ यांना भारतात बोलावून मोदी यांनी चांगुलपणा मिळवला आहे; पण त्यापेक्षा जास्त काहीही या भेटीतून मिळालेले नाही. द नेशन या इंग्रजी वृत्तपत्राने नेहमीप्रमाणे काठावर असा मथळा संपादकीयाला दिला आहे. शरीफ यांचा दिल्ली दौरा ही एक स्मार्ट राजकीय चाल होती. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी लाहोरपर्यंत शांतता फेरी काढली होती, याची आठवण करून देत या वृत्तपत्राने फक्त संकेतापेक्षा आणखी काही करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. भारताचे नूतन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवले व त्यानंतर शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह सार्क नेत्यांना शपथविधीसाठी बोलावले ही मोदी यांची एक हुशार खेळी आहे; पण आता राजकारणही बदलावे अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असे या संपादकीयात म्हटले आहे. द न्यूजने ए न्यू पेज असा मथळा दिला असून, शरीफ यांच्या या भेटीतून फारसे काही अपेक्षित करणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान मोदी जर पाकिस्तानला आले तर आम्ही गुजरातमधील हत्याकांडाचा विषय काढू, असेही या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
चर्चेच्या यशाबद्दल पाक माध्यमे साशंक
By admin | Published: May 29, 2014 4:22 AM