Sri Lanka Crisis : राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, श्रीलंकेत आता आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यासोबतच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे काळजीवाहू राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर जात आहे. लोक विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनाही जमावाविरोधात अश्रुधुराचा वापर करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून देशात आणीबाणी लागू केली आहे. तसंच प्रश्चिम प्रांतात कर्फ्यू लागू केला आहे, अशी माहिती विक्रमसिंघे यांच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. बुधवारी मोठ्या प्रमाणात आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष दोघांनीही सरकारच्या बाहेर राहावं अशी लोकांची मागणी असल्याचं श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माजी सल्लागारांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.