नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघटनेत दहशतवादावरून भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानची जोरदार धुलाई केल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांचा तिळपापड झाला आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यानंतर दुसऱ्या मंत्री शाजिया मर्री यांनी ‘आम्ही अणुबॉम्ब शांत बसण्यासाठी बनविला नाही,’ अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी त्यांनी बिलावल यांच्या वक्तव्याची पाठराखण केली खरी पण ‘पाक हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे सांगून एक पाऊल मागेही घेतले.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकने भारतापेक्षा कितीतरी जास्त बलिदान दिले आहे, असे आश्चर्यकारक ट्टीट शाजिया यांनी केले आहे. ‘भारतीय प्रसार माध्यमांतील काही घटक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतीय मंत्र्यांच्या चिथावणीखोर टिप्पण्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने भारतापेक्षा कितीतरी अधिक बलिदान दिले आहे. मोदी सरकार अतिरेकी आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या.
गरज पडल्यास मागे हटणार नाही...‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे भारताने विसरू नये, आमची आण्विक स्थिती गप्प बसण्यासाठी नाही. गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही.शाजिया मर्री
ओसामा बिन लादेनचा हुतात्मा म्हणून गौरव करणारा आणि झकीउर रहमान लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश पाकिस्तान आहे, असे भारताने म्हटले होते.