इम्रान खान यांना हटवून शाहबाज शरीफ आज पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान पद नक्की होताच त्यांनी भारतावर मोठे वक्तव्य केले आहे.
शाहबाज शरीफ यांची थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे. शरीफ यांनी १७४ मते घेऊन इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार शाह मोहम्मद कुरैशी यांना मात दिली आहे. संसदेत मतदानापूर्वी इम्रान खान यांच्या पक्षातील सर्व खासदारांनी राजीनामा देत सभागृहाचा त्याग केला. शनिवारी रात्री इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता तेव्हापासून देशातील नव्या पंतप्रधानांबाबत चर्चा सुरू होती.
शाहबाज यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश जारी केला आहे. यामध्ये काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेची तयारी दर्शविली आहे. काश्मीरी लोकांच्या इच्छेनुसार काश्मीरचा प्रश्न सोडविला पाहिजे, असे ते म्हणाले.
दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरु ठेवू शकत नाही, असा दम पाकिस्तानला भरत मोदी सरकारने पाकिस्तानशी चर्चा थांबविली होती. तसेच काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करून विशेष दर्जा काढून घेतला होता. यावरून पाकिस्तानचे हटविण्यात आलेले पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी व्यापारही थांबविला होता. त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहेत.
आता शाहबाज यांनी पुन्हा काश्मीर मुद्दा उकरला आहे,. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. जोवर काश्मीरवर शांततेच्या मार्गाने तोडगा निघत नाही तोवर हे शक्य नाहीय. आम्ही काश्मीरी लोकांना त्यांच्या परिस्थितीवर सोडू शकत नाही. राजनैतिकदृष्ट्या आम्ही काश्मिरी जनतेला आमचा पाठिंबा देत राहू, असे शाहबाज म्हणाले. काश्मीर प्रश्नावर तोडगा फक्त आणि फक्त काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसारच हवा. त्यांच्या वेदना कमी झाल्या पाहिजेत, तेथील गरिबी दूर व्हायला हवी, असे शाहबाज म्हणाले आहेत.