ग्रामीण भागात आधार कार्डसाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने, २० किलोमीटर लांब तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असून, आर्थिक भुर्दंडासह रोजंदारीही बंद ठेवून आधार कार्ड काढणे, अपडेट करणे, यासाठी पालकांना जावे लागत आहे. यामुळे ग्रामीण भागात आधार कार्ड केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
धरणगाव तालुका परिसरातील ग्रामीण भागात आधार कार्ड केंद्र कमी असल्याने, विद्यार्थी व पालकांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप होताना दिसत आहे.
शासनाची वेळोवेळी अनेक पत्रके निघत असतात. अनेक शासकीय योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याने ते अत्यावश्यक आहे. लहान मुलांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याने त्यांचे बँकेत खाते उघडू शकत नाही.
दुसरीकडे सध्या उन्हाळ्यातील शालेय पोषण आहाराचे पैसे हे बँक खात्यावर वर्ग केले जात असल्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थांना बँक खाते आवश्यक आहे.
बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड शिवाय उघडले जात नाही. लहान मुलांचे बालआधार असल्याने त्यांचे बोटांचे ठसे तेथे उमटत नाही. यामुळे लहान मुलांना घेऊन पालक थेट २० किलोमीटर लांब अशा तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागत आहे. तेथे जाऊनही एखादा कागदपत्रे अपूर्ण राहिले, तर पुन्हा त्यांना दुसऱ्या दिवशी आधार कार्डसाठी जावे लागते.