आॅनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर,दि.२६- येथून जवळच असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पाण्याचा अशुद्ध व गढूळ पुरवठा होत असल्याने देशी व विदेशी पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अजिंठा विकास योजना व जपान सरकारच्या अर्थसहाय्यातुन लेणी परिसरात पर्यटकांच्या सुख सुविधांसाठी कोटी रुपये खर्च करून तोंडापुर (ता.जामनेर) १० किलोमीटर अंतरावरून लेणी साठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत केली आहे. तर पाणी फिल्टर प्लान्ट फदार्पूर (ता.सोयगाव) येथे तयार केला आहे. या ठिकाणावरून शुद्ध पाण्याचा पुरवठा अजिंठा लेणी करण्यात येतो. याअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने लेणी क्रमांक. 4, 6, व 16 मध्ये पर्यटकांना पिण्याचे थंड पाणी मिळावे म्हणून वॉटर कुलर बसविले आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून या वॉटर कुलर द्वारे दुर्गंधीयुक्त पिवळसर अशुद्ध पाणी येत आहे. यामुळे पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लेणी परिसरात पाण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
याबाबत भारतीय पुरातत्व विभागाशी संपर्क साधला असता सहाय्यक संवर्धक डी. एस. दानवे हे विदेश दौºयावर गेले असल्याचे सांगण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी कोणीही उपलब्ध झाले नाही.