जामनेर (जि. जळगाव): भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीसायमार्फतची कापूस खरेदी तात्काळ सुरु केली जाईल. तसेच सन २०२६ पासून शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज पुरवठा उपलब्ध करुन दिला जाईल, अशा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शेंदुर्णी ता. जामनेर येथे केल्या. शेंदुर्णी येथील शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केले असतील, त्याबाबत १५ दिवसात निर्णय घेतला जाईल. तसेच जे शेतकरी सोलर पंप मागतील त्यांना आगामी दोन महिन्यात सोलर कनेक्शन दिले जाईल. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.