अमळनेर : मान्सूनचा पहिला पाऊस पडल्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. मुडी बोदर्डे परिसरात शेतकरी पिके वाचवण्यासाठी चुहा पद्धतीने पाणी देऊन पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत.
हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला आहे. जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाची अपेक्षा असताना समाधानकारक पाऊस झाला नाही. मुडी बोदर्डे परिसरात जमिनी कोरड्याच असून तडे पडू लागले आहेत. शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला कापूस लागवड केली तसेच पेरणी केली; परंतु पावसाअभावी पिके कोमजून गेले. काही शेतकऱ्यांनी पुनश्च लागवड केली; परंतु पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे हीच परिस्थिती उद्भवली. त्यामुळे शेतकरी वर्गातून पिकांना जीवनदान देण्यासाठी चुहा देणे सुरू आहे. यामुळे पिकांना जीवनदान मिळणार आहे.
काही भागांत थोड्याफार हलक्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे; परंतु भरपूर प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पन्न हातचे जाणार आहे. दुबार पेरणी करावी लागणार आहे. कोरोनाच्या संकटांनंतर संभाव्य दुष्काळाच्या संकटाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नंतर पाऊस पडला तरी पिकांना त्याचा त्या प्रमाणात उपयोग होणार नाही. उत्पन्न निश्चित घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लागवड करावी लागणार असल्यामुळे शासनाकडे मोफत बियाण्याची मागणी केली आहे.
030721\03jal_3_03072021_12.jpg
मुडी बोदर्डे परिसरात चुहा पद्धतीने पिकांना घोटघोट पाणी देताना शेतकरी. (छाया : अंबिका फोटो, अमळनेर)