बाबा...चोरी झाली तर...
जळगावात चोर्यांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. भरदिवसात रूग्णालये, बसस्थानक एवढेच नव्हे तर अपार्टमेंटच्या कंपाउंडमधून दुचाकी चोरीला जात होत्या. चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. आव्हाण्यातील १२ बंद घर टार्गेट करून घरफोड्या करित हजारोंचा ऐवज लंपास चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री बारा घरांमध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कुठे बाहेरगावी जाणे नागरिकांना महाग पडत आहे. पोलिसांनी गस्त वाढवित, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, घर सोडून जाणार नाही रे भो...अशी चर्चा गावातील कट्टयांवर ऐकायला मिळत आहे. अनलॉकनंतर अनेकांनी बाहेर फिरण्याचा बेत आखला आहे. त्यातच कुलूप बंद घर टार्गेट करून चोरटे हात साफ करीत आहेत. मध्यंतरी दुचाकी चोरट्यांनी जळगावकर हैराण झाले होते. एवढेच नव्हे तर बसस्थानकावर सुध्दा गर्दीचा फायदा घेवून मंगळसूत्र चोरून नेण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या होत्या. शहरात सुरू असलेल्या चोरीच्या घटना कधी थांबतील, अशी चर्चा आता गल्ली बोळात सुध्दा ऐकायला मिळत आहेत. चोरीच्या घटनांप्रमाणे खूनाच्या घटनाही शहरात वाढल्यामुळे कधी जळगावात क्राईम रेट कमी होईल, अशी चर्चा सर्वसामान्यांमधून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सागर दुबे