लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील कालंका माता मंदिर परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मंदिराजवळील चौकात दुभाजकाचे काम केल्यानंतर तेथे वळण घेण्यासाठी जागाच ठेवली नाही. त्यामुळे येथून ज्ञानदेव नगर, सदोबा नगर, जुने जळगाव या भागाकडे जाणाऱ्या वाहनधारकांना वळण घेण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. माजी उपमहापौर सुनिल खडके यांनीही या ठिकाणी भेट देऊन वळण घेण्यासाठी रस्ता करून देण्याची मागणी केली. तसेच येथे दुभाजक तेथे बसवु नये अशी मागणी केली.
भुसावळकडुन येणाऱ्या नागरिकांना जुन्या जळगाव कडे जाण्यासाठी किंवा अयोध्या नगर, ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड या भागातील सुमारे एक लाख लोकवस्तीतील नागरिकांना आपापल्या घराकडे जाण्यासाठी एकमेव मोठा चौक आहे. मात्र काही दिवसांपासून महामार्ग प्राधिकरणाने या भागात रस्त्याचे काम सुरू केले. या ठिकाणी दुभाजक तयार करु नये, अशी मागणी नागरिकांनी केली होती. जाण्या येण्यासाठी वळण रस्ताच नसल्याने अनेक वाहनधारक विरुद्ध बाजुने प्रवास करत आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळची सुरूवात अपघातानेच
सकाळी या ठिकाणी दोन चारचाकी वाहने विरुद्ध दिशेने एकमेकांसमोर आली. त्यांचा किरकोळ अपघात झाला. मात्र त्या दोघांनी हे प्रकरण परस्परांत मिटवले. मात्र या ठिकाणी भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने येथे वळण रस्ता करून देण्याची मागणी केली आहे.
आयएमआर जवळ देखील हीच समस्या
शिवकॉलनीकडे जातांना आयएमआरजवळ देखील अशाच प्रकारे वळण रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जणांना विरुद्ध दिशेने जावे लागते. त्यात देखील अपघात होण्याची शक्यता आहे. आयएमआर नंतर अर्धा किमी लांब अंतरावर शिव कॉलनी येथे वळण देण्यात आले आहे. त्यामुळे येथे देखील अपघाताची शक्यता आहे.