लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या दोन वर्षांची कोविडच्या काळातीलही आकडेवारी बघितली असता या ठिकाणी सर्वाधिक रक्ताची गरज ही गर्भवती महिलांना लागली आहे. सिझेरीयनच्या ६० टक्के आणि सामान्य प्रसुती होणाऱ्या ५० टक्के महिलांना रक्त द्यावे, लागते अशा स्थितीत रक्तपेढ्यांमधील ६० ते ७० टक्के रक्त हे महिलांसाठी लागत असते. त्यामुळे हिमोग्लोबीनची पातळी चांगली असलेल्या महिलांनी रक्तदानात पुढाकार घ्यावा व रक्तसाठा वाढविण्यासाठी योगदान द्यावे, किमान दुसऱ्या महिलेसाठी तरी एका महिलेने पुढे यावे, असे आवाहन तज्ञांकडून केले जात आहे.
रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र ते त्यांनी दूर करून यात पुढाकार घेतला पाहिजे, असेही डॉक्टर सांगतात. महिलांचे गैरसमजामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. पुरूषांच्यात तुलनेत महिलांचे रक्तदानाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यास, रक्ताचा साठा वाढू शकेल, शिवाय आता नॉन कोविड यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतर रक्ताची मोठी गरज भासणार असून तुडवडा निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनीच दुसऱ्यांच्या जीव वाचविण्यासाठी आता पुढे यावे. असे आवाहन विविध क्षेत्रातून केले जात आहे.
१ ते ३ बॅग पर्यंत लागते रक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२० मध्ये ११६१ महिलांची प्रसुती झाली. दरम्यान, ५७० महिलांचे सिझेरीयन झाले आहे. महिलांना प्रसुतीदरम्यान हिमोग्लोबीनची पातळी योग्य राखण्यासाठी महिलांना रक्तद्यावे लागते. यात एक ते तीन बॅग पर्यंत रक्त द्यावे लागते, त्यामुळे रक्ताची खरी गरज या ठिकाणी असते, अशा स्थितीत लवकर रक्त उपलब्ध न झाल्यास महिलेच्या जीवाला धोका असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
रक्तदानाविषयी तज्ञ काय म्हणतात...
रक्तदानामुळे तुम्हाला अशक्तपणा येत नाही, तुम्ही आजारीही पडत नाही. प्रत्येक सुदृढ व्यक्ती दर तीन महिन्याने रक्तदान करू शकतो. तुम्हाला नवीन रक्त शरीरात तयार झाल्याने एक ऊर्जा मिळते. -डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी
रक्तदानाने तुम्हाला ऊर्जा मिळते. तुमच्या शारीरिक नियमिततेला कुठलीही बाधा पोहचत नाही. तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्त कमी होईल, मी अशक्त होईल, हा गैरसमज बाळगू नये.- डॉ. मारोती पोटे, उपअधिष्ठाता, जीएमसी
महिलांनीही रक्तदानात पुढाकार घ्यावा, रक्तदानामुळे तुम्हाला कसलाच त्रास होत नाही, तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार झाल्याने रक्तभिसरण उत्तम राहते, तुम्ही निरोगी राहतात. गरोदर महिलांना सर्वाधिक रक्त लागत असते. सर्व गैरसमज दूर ठेवून रक्तदान करावे. - डॉ.संजय बनसोडे, स्त्री रोग विभाग प्रमुख,
तुमच्या रक्तदानाने दुसऱ्याचा जीव वाचतो हे एक आत्मिक समाधान तर असतेच शिवाय तुमचे रक्त शुद्ध होते, नवीन रक्त तयार होते, तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते. दर तीन महिन्यांनी तुम्ही रक्तदान करू शकतात तर कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर तुम्ही १४ दिवसांनी रक्तदान करू शकतात.- डॉ. नलिनी वैद्य, प्रमुख, गोळवलकर रक्तपेढी.