पोलीस प्रशासन म्हणते की, आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, असे सांगून हात झटकत आहे. तसेच गावासाठी नेमलेली कोरोना समितीसुद्धा फक्त कागदावरच आहे.
या ठिकाणी पोलीस पाटील, तलाठी, ग्रामविकास अधिकारी हे कोणीही हजर नव्हते. बाजार भरल्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. बाजारामध्ये भाजीपाला विक्रेते व ग्राहक कुठल्याही प्रकारचे मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाही.
ऐनपूर येथील सरपंच अमोल महाजन व उपसरपंच व अन्य ग्रामपंचायत सदस्य यांनी बाजार उठवण्यासाठी प्रयत्न केला; परंतु त्यांनासुद्धा नागरिकांसमोर हतबल व्हावे लागले. त्यांनी नागरिकांना विनवणी केली. प्रसंगी विक्रेत्यांचे वजन काटेसुद्धा जमा करून घेतले; परंतु तरीसुद्धा लोक जुमानत नव्हते. गावातील लोकसुद्धा आम्हाला भाजीपाला मिळाला नाही तर आम्ही काय खाणार, असे प्रश्न सरपंचांना विचारत होते. ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.