दरम्यान, आनंदनगर शाखेत पुन्हा गृहकर्ज घोटाळा झाल्याची तक्रार मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी हडपलेल्या बारा लाखांच्या कर्जाची तक्रार दाबण्यासाठी पुन्हा १६ लाखांच्या गृहकर्ज घोटाळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढे सर्व झाल्यानंतरही घर बांधकाम करून न दिल्यामुळे अखेर फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर एका महिलेने तक्रार केली आहे.
याबाबत आर्थिक फसगत झालेली महिला अफसानाबानो कलीम खान, (रकानगर, भुसावळ) यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आपल्या स्टेट बँक, आनंदनगर, भुसावळ या शाखेतून सन २०१९ मध्ये गृहकर्ज रक्कम १२ लाख मंजूर झाले होते. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक यांनी मध्यस्थी एजंट नामे महेमूद पठाण, महेंद्र पाटील, रवींद्र सपकाळे (सर्व रा. भुसावळ) यांना माझे संमतीविना परस्पर माझी कोणत्याही प्रकारे सही न घेता संगनमताने आपसात वाटून घेतली. त्यानंतर मी बँकेत रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून दिले. काही महिन्यांनंतर तेथे तत्कालीन व्यवस्थापक नंदलाल पाटील यांची नियुक्ती झाली. तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु त्यांनीदेखील या मध्यस्थींच्या महसूल सहाय्यक सोबत संगनमत करून मला खाली प्लॉट आहे का, अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना हो असे सांगितले. तेव्हा त्यांनी माझ्या मालकीचा भुसावळ येथील स.नं. ५/३ प्लॉट क्रमांक ५४ असलेला रिकामा प्लॉट संबंधित कागदपत्रे दिले. संबंधित मॅनेजर व मध्यस्थी यांनी मला सांगितले की, आम्ही तुम्हाला या प्लॉटवर १६ लाखांचे हाउसिंग लोन मंजूर करून देतो. हे प्रकरण मंजूर करून रक्कम ही वरील ठेकेदार म्हणून उभे केलेले मध्यस्थीपैकी मेहमूद पठाणचे भाऊ नामे अजीज पठाण याच्या नावे परस्पर वर्ग केली. मात्र त्याने आजपावेतो मी तारण केलेल्या प्लॉटवर एका विटेचेसुद्धा बांधकाम न करता माझी आर्थिक फसवणूक केली आहे.
संबंधित १८ गृह कर्जदारांविरुद्ध अपहाराबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात २९ मे २०१९ रोजी तक्रार अर्ज दिला आहे.
-हर्षवर्धन बेलेकर, स्टेट बँक ऑफ इंडिया, आनंदनगर शाखा, भुसावळ