- संजय सोनार जळगाव - दोन लाखांची लाच घेणाऱ्या बहाळ ता. चाळीसगाव येथील ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपिक व पंटर अशा तीन जणांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बहाळ गावातच गुरुवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. सरपंच राजेंद्र महादू मोरे (५७), ग्रामपंचात लिपिक शांताराम तुकाराम बोरसे (५०) व पंटर सुरेश सोनू ठेंगे (४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
७० वर्षीय तक्रारदार यांची बहाळ येथे शेत जमीन आहे. त्यावर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता होती. त्यामुळे तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीविरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला. त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे याने तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतीकडून कुठलाही त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल, असे सांगितले. त्यास तक्रारदाराने नकार दिल्याने मोरे याने १० लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत पाच लाखांवर तडजोड झाली. लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन लाखाची घेताच तीनही जणांना अटक करण्यात आली.