लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कडधान्य साठ्यावर मर्यादा आणत केंद्र सरकारने नवीन बंधने लादल्याच्या निषेधार्थ सोमवार, ५ जुलै रोजी कृषी बाजार समितीमधील धान्याचे व्यवहार बंद राहणार आहेत. या विषयी जळगाव मार्केट यार्ड असोसिएशनची शनिवारी बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सोमवारी शेतकऱ्यांनीदेखील बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
धान्य, कडधान्य साठवणूक विषयी केंद्र सरकारने गेल्या वर्षीच सर्व बंधने हटविली होती. त्यानंतर आता अचानक कडधान्य साठवणुकीविषयी बंधने लागू केली असून २ जुलै रोजी तसा अध्यादेश काढला.
या अध्यादेशानुसार ठोक (होलसेल) विक्रेत्यांना २०० मेट्रिक टन साठा करता येणार आहे. यातही एका प्रकारच्या धान्याचा १०० मेट्रिक टनपेक्षा जास्त साठा राहणार नाही, अशी अट टाकण्यात आली आहे. या शिवाय किरकोळ विक्रेत्यांना पाच मेट्रिक टनपर्यंत साठा करता येणार आहे.
या बंधनानुसार व्यापाऱ्यांचे नुकसान होण्यासह शेतकऱ्यांनाही किमान आधारभूत किंमत मिळणेही अवघड होईल, असे मार्केट यार्ड असोसिएशनचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकरी व व्यापाऱ्यांविरोधात असून याच्या निषेधार्थ सोमवारी बाजार समितीमध्ये धान्य खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याविषयी बाजार समितीच्या सभापतींना मार्केट यार्ड असोसिएशनने निवेदन दिले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनाही कळविण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण बेहडे, उपाध्यक्ष शशिकांत बियाणी, सचिव सुनील तापडिया उपस्थित होते.
शेतीमाल आणू नका
व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनीही या दिवशी आपला शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीतर्फे सचिव आर.के. माळी यांनी केले आहे.