लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पावसाळ्याच्या दिवसात सापांचा संचार वाढण्याचे प्रमाण वाढून संर्पदंशासारख्या घटना होतात व यात अनेकांना जीव गमवावा लागतो. यात नागरिक आणि सर्पांचा जीव वाचवे यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र सर्पदंश नियोजन कार्यक्रम या अभियान अंतर्गत जिल्हाभरात कार्य करीत आहेत. या अभियानांतर्गत संस्थेच्या सर्पमित्रांनी गेल्या दीड महिन्यात शहरातून तब्बल ९३ विषारी सर्प पकडले. यात मण्यार, घोणस, नाग हे प्रमुख विषारी साप पकडण्यात आले.
प्रणय काळ, बिळांमध्ये पाणी जाणे, पावसाळ्यात जमिनीतील उष्णता बाहेर पडते, अडगळीच्या ठिकाणी जास्त दमट वातावरण तयार झाल्याने तेथील साप सुरक्षित निवारा शोधत बाहेर पडतात. दिवसा वावरणारे साप नागरिकांच्या नजरेत पडतात पण विषारी मण्यार सारखे निशाचर साप हे रात्री जास्त ॲक्टीव्ह असतात. रात्रीच्या वेळी जमिनीवर झोपणाऱ्या नागरिकांना याचा धोका अधिक असतो. यामुळे संस्थेचे पदाधिकारी या दिवसात शोध मोहीम राबवित आहे.
२६ घरांमध्ये आढळले साप
संस्थेच्या सर्पमित्रांनी गेल्या दीड महिन्यात जळगाव शहरातून ९३ विषारी सर्प पकडले. यात मण्यार, घोणस, नाग हे प्रमुख विषारी साप पकडण्यात आले. यातील २८ मण्यार आणि १४ घोणस हे मध्यमवर्गीय आणि गरीब वस्तीत आढळून आल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी दिली. यात २६ नागरिकांच्या घरात साप आढळले तर उर्वरित अंगणात पकडले आहेत. २६ पैकी १५ घरात मण्यार तर ११ ठिकाणी घोणस आढळून आल्याचे देवरे यांनी सांगितले.
चार ठिकाणी अंथरुणात साप
जळगाव शहरात ४ घटनांमध्ये मध्यरात्री जमिनीवर झोपलेल्या नागरिकांच्या अंथरुणात सर्प आढळून आले. यात एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती याच प्रकारे मण्यार दंशापासून वाचल्या तर मोहाडी येथील एक कुटुंबीय घोणस दंशा पासून वाचले. सर्पमित्र जगदीश बैरागी आणि सुरेंद्र नारखेडे यांनी पहाटे हा घोणस सर्प पकडला. रात्रभर हा साप आपल्या अंथरुणावर फिरत असेल हा मोठा धक्का सदर कुटुंबियांना बसला.
सर्पदंशाने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू
एका बांधकाम साईटवर काम करणारे सुरक्षा रक्षक कुटुंब झोपडीत जमिनीवर झोपले असताना मध्यरात्री त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीला मण्यार सापाने दंश केला. सध्याचा काळ हा सर्पाच्या प्रणयाचा, मुक्त संचाराचा काळ असल्याने जिथे जितकी स्वछता जास्त तिथे सापांचा वावर कमी असतो.
अडगळीत साहित्यात अधिक धोका
सापांचा शोध घेत असताना निम्मे पेक्षा जास्त भागात दगड, जुन्या विटा, लाकूड, भंगार, अडगळ याचा संग्रह केलेल्या ठिकाणी साप आढळून आले. त्याच प्रमाणे तुंबलेल्या गटारी, कच्ची मातीची आणि पार्टिशनची घरे, जमिनीला समांतर घरांमध्ये देखील साप आढळून आले. ज्या भागात उष्टे, खरकटे अन्न आणि केरकचरा टाकला जातो तिथे देखील साप आढळून आल्याचे सांगण्यात आले.
———————-
हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर, वाघ नगर, मोहाडी आणि परिसरातून अनेक वेळा मण्यार, नाग, घोणस या विषारी सापांना पकडले आहे. यातील ३ ठिकाणी चक्क अंथरुणातून साप पकडले तरी नागरिक जमिनीवर झोपतात, हे धोकेदायक आहे.
- जगदीश बैरागी, सर्पमित्र.