रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक चहा-पाण्यापुरतीच असते की का?
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे नुकतीच रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. दर तीन महिन्यांनी ही बैठक होत असते. कोरोनामुळे २५ जूनला ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठक डीआरएम यांच्यासह प्रवासी सल्लागार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर या बैठकीची प्रवाशांमध्ये दोन दिवस चांगलीच चर्चा रंगली होती.
यातील पहिला किस्सा सांगायचा म्हणजे, दोन दिवसांपूर्वी काशी एक्सप्रेसमध्ये पाचोऱ्याहून काही प्रवासी जळगावला येण्यासाठी बसले. हे सर्व प्रवासी २५ रोजी झालेल्या बैठकीत काय झाले, आपल्या सदस्यांनी पॅंसेजर सुरू करण्याबाबत आणि गाड्यांच्या वेळा बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित केले, यावर एकमेकांना प्रश्न विचारू लागले. यावर एका प्रवाशाने नेहमी प्रमाणे सल्लागर समितीचे सदस्य रेल्वे अधिकाऱ्यांकडे विविध गाड्यांच्या मागण्या करत असतात. मात्र, एक सुद्धा मागणी पूर्ण होत नाही. प्रत्येक बैठकीला याच मागण्यांवर चर्चा होत असल्याचे म्हटले. यानंतर त्याच मुद्दयावर दुस*या प्रवाशाने, अहो..रेल्वे अधिकारी फक्त नियमांचे पालन करून दर तीन महिन्यांनी ही बैठक नावाला ठेवतात आणि सदस्यांना चहा, पाणी आणि बिस्कीटे खाऊ घालून घराकडे पाठवत असल्याचे ठसकेबाज उत्तर दिले. यावर गाडीमधील इतर प्रवाशांमध्ये चांगलाच हशा पिकला...तर शेवटी जळगाव स्टेशन आल्यावर एका प्रवाशाने, भाऊ,रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक चहा-पाण्यापुरतीच असते की काय...अशी कोपरखळी मारून, इतर प्रवाशांना हसविण्याचा प्रयत्न केला. एकूण काय, तर बैठकीनंतर भुसावळ विभागातील पॅंसेंजर कधी सुरू होणार..हीच चर्चा सध्या सर्वत्र जोराने सुरू आहे.
सचिन देव